“कर्मयोगी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उत्साहात संपन्न…  – ९ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ – हर्षवर्धन पाटील

बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

           कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२३-२४ चा ३४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे चेअरमन श्री. हर्षवर्धनजी पाटील,यांचे शुभहस्ते संपन्न झाले. 

         कारखान्याचे संचालक श्री.भूषण प्रकाश काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वृशाली भूषण काळे या उभयतांचे शुभहस्ते सोमवारी विधिवत पूजा करण्यात आली. 

            यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच निरा-भिमा कारखान्याचे संचालक श्री. राजवर्धन हर्षवर्धनजी पाटील उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री यांनी प्रथमत: शारदा महोत्सवाच्या ९ व्या माळेच्या शुभमुहूर्तावर बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम साजरा करीत असल्याने सर्वांचे अभिनंदन व उद्या असणा-या विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

         त्यांनी पुढे बोलताना या गाळप हंगामामध्ये आपण ९ लाख मे.टन ऊस गाळप करणेचे उद्दिष्ठ ठेवले असल्याचे सांगितले व साखर रिकव्हरी ११ टक्के पेक्षा जास्त मिळविण्याच्या सर्व अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

           या हंगामामध्ये कार्यक्षेत्रातील सर्वच्या सर्व ऊस आपले कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे सभासदांना आवाहन केले.

           कारखान्याचे १ नोव्हेंबरला गाळप हंगाम सुरु करणेच्या दृष्टीने सर्व तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज झालेली आहे. मागील हंगामात खेळते भांडवल कमी पडले,परिणामी ऊसबीले,वाहतुक बीले,कमिशन व कामगारांचे पगार या सर्व गोष्टींना विलंब होत गेला.या गोष्टीचा सर्वांनाच आणि आम्हालाही खूप त्रास झाला.झालेल्या विलंबाबाबत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली.

           यावर्षी सभासदांना सभासद दराने साखर देताना चांगल्या दर्जाची साखर देत आहोत.कारखान्यावरील विश्वासामुळे ऊस उत्पादक, वाहतुकदार व कामगार यांनी कारखान्याकडे एच्छिक ठेवी ठेवलेल्या आहेत. 

         यावेळी कारखान्याचे चेअरमन यांनी इंदापूर तालुक्याच्या भूतकाळाचा आढावा घेताना काही आठवणी जाग्या केल्या,१९८४ साली ऊसाचे किती अल्प क्षेत्र होते, आणि आज तालुक्यामध्ये ३० लाख टन ऊस कुणामुळे उभा राहिला तर तो केवळ कर्मयोगी भाऊंमुळे,भाऊंनी तालुक्यामध्ये हरितक्रांती,धवलक्रांती घडवुन आणली आणि त्यामुळे तालुका सुजलांम सुफलांम झाला.

           आज तालुक्यामधील आपण पिकविलेला परिपक्व ऊस इतर कारखान्यास गाळपास जातो आणि आपले कारखान्यास ४३४ जातीचा ऊस जो ऊस केवळ ६.५ टक्के रिकव्हरी देतो,जळीत झालेला,रोगग्रस्त ऊस आपले कारखान्यास गाळपास येतो.कधी कर्मयोगी सोडून कुठल्या दुस-या कारखान्याने जळालेला ऊस वाहतुक करुन गाळप केलेला आहे असे एकतरी उदाहरण आपल्याला दिसले का? असाही सवाल यावेळी त्यांनी उपस्त्थित केला. येणाऱ्या गळीत हंगामाची सुरुवात १ नोव्हेंबर रोजी गव्हाण पूजन व मोळी पूजनाने आपण करणार आहेत.त्यावेळी कार्यक्षेत्रातील ५१ जेष्ठ सभासदांचे शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.कर्मयोगी परिवारावर तालुक्यातील ८४ गावांचा प्रपंच चालू आहे.

         यावर्षी आपला ऊसाचा ऍ़डव्हान्स इतरांचे बरोबरीने किंवा काकणभर पुढेच असणार आहे याबाबत आपण निश्चिंत रहावे.या हंगामातील ऊसाची हंगाम शेवटपर्यंत सर्व बिले वेळेवरंच मिळतील याबाबतची हमी आम्ही घेतलेली आहे.

           यावेळी बोलताना चेअरमन यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी आम्ही गेटकेनचा दौरा केला,त्यामध्ये आम्ही जेऊर,कंदर,चिखलठाण येथील गावात गेलो असता त्या भागातील ऊस उत्पादकांनीही चांगल्या भावना व्यक्त करुन सहकार्य करणेचे आश्वासन दिलेले आहे. तसेच कामगारांची मागील सर्व देणी पूर्ण केलेले आहेत,दिवाळी सणासाठी बोनसही दिला जाणार आहे. एखादी गोष्ट चांगली चालत असेल तर शक्तीस्थळावर हल्ले होत असतातच,कारण त्यांना त्यातून स्वत:चा स्वार्थ साधायचा असतो,पण हा स्वार्थ क्षणिक असतो,कारण तालुक्याचा शेतकरी हा कर्मयोगी परिवाराच्या नाळेशी जुडलेला आहे,तो क्षणिक भूलथापांना बळी पडत नाही हे मलाही माहिती आहे. या वर्षी कारखान्याने कमीत कमी खर्चामध्ये सगळे कारखान्याचे मेंटेनंसचे काम केले आहे,याबद्दल सर्व स्टाफचे आभार मानले आणि हा हंगाम सर्व विभागाच्या समन्वयाने आणि सर्व सभासदांचे साथीने जास्तीत जास्त ऊस गाळप करुन व रिकव्हरीमध्ये वाढ करुन यशस्वीपणे पूर्ण करणेचा आहे असेही त्यांनी सांगितले. 

           आजचे बॉयलर अग्निप्रदिपन समारंभाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी केले.या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,पराग जाधव,छगन भोंगळे,वसंत मोहोळकर,रतन देवकर,हनुमंत जाधव,भूषण काळे,विश्वास देवकाते,राहूल जाधव,अंबादास शिंगाडे,केशव दुर्गे,हिरालाल पारेकर,प्रदिप पाटील,शांतीलाल शिंदे,निवृत्ती गायकवाड,सतीश व्यवहारे,अशोक कदम,प्रविण देवकर,माजी व्हाईस चेअरमन भागवत भाऊ गटकुळ,माजी संचालक मानसिंग जगताप,सुभाष भोसले,भाऊसो चोरमले,पिंटू काळे,नवनाथ काळे,शेतकरी संघटनेचे निलेश देवकर,अभंग अण्णा,पांडुरंग गलांडे,राघू काटे,कुबेर पवार, इत्यादी पदाधिकारी,ऊस वाहतुक कंत्राटदार व सभासद बंधू, कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.