संकल्प “पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा”!.. — आळंदी नगरपरिषदे मार्फत एकूण 6 मूर्ती संकलन केंद्र..!

 

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक 

पुणे विभागीय 

आळंदी : आळंदी नगरपरिषदेने समस्त आळंदी पंचक्रोशीत यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून “माझी वसुंधरा अभियान 4.0” अभियाना अंतर्गत जल स्त्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरात एकूण 6 मूर्ती संकलन केंद्रांचे नियोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन नदी पत्रात न करता नगरपरिषदेच्या मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती दान करावे असे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

        गणेशोत्सव कालावधीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्मोकोलची सजावट इत्यादी गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो जे पाण्यात न विरघळणारे व विषारी पदार्थ आहेत. या मुर्त्यांचे नद्या,तलाव,विहिरी यांमध्ये विसर्जन केल्यानंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच राहतात परिणामी जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे आळंदी नगरपरिषद मागील काही वर्षांपासून “मूर्ती दान” ही संकल्पना अत्यंत प्रभावी पने राबवित असून यास समस्त आळंदीकरांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे.

       नगरपरिषदे मार्फत तयार केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर विधिवत आरती करून गणेश मुर्त्यां व्यवस्थित रित्या जमा केल्या जातात व या मुर्त्या पुढे पुनर्वापरा साठी सेवा भावी संस्थांना दिल्या जातात.या संस्थान मार्फत सर्व गणेश मुर्त्याचे पावित्र्य जपत त्यांचा पुनर्वापर केला जातो त्यामुळे जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखले जावून पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो. दीड दिवसांच्या साधारण 150 गणेश मूर्तींचे संकलन या केंद्रांवर झाले असून नगरपरिषदेचे 75 अधिकारी,कर्मचारी या केंद्रांची व्यवस्था पाहत आहेत.