आपला हितकर्ता कोण ?

 

        आपल्या सर्वांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनामुळे आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणा झाली आहे,त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली लिखित पुस्तके वाचणे आणि त्याचा मर्म जाणून घेऊन स्वतः अंगी आत्मसात करणे गरजेचे आहे.

        म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठ्या दुःखी, खिन्न अंतकरणाने म्हणतात:–

      माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे,पण माझ्या पश्चात या समाजाचे कसे होईल? ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत? या सर्व गोष्टीचा विचार केला की, माझे आयुष्य तुझ्यासाठी फुकट खर्ची घातले असे वाटू लागते..

(संदर्भ – खंड.18 भाग – 3. पृष्ठ. क्रं.315 पैरा – 1.)

         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या मानसिक अवस्थेत हे उद्गार काढले असतील त्याची कल्पना करवत नाही.आणि मला हे त्यांचे बोल,वाक्य लिहितानी हृदय दाटून येऊन पापण्या ओल्या होतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस उतरत्या वयात पंगू आणि शिथिलगात्र अवस्थेत असतानी एके दिवशी ते नानकचंद रट्टूला म्हणाले होते ते असे :-

        माझ्या लोकांना सांग की, जे काही मी केले आहे ते मी अनंत हालअपेष्टा आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मी मिळवले आहे. महत प्रयासाने हा काफीला जिथे दिसतो आहे तेथे आणून ठेवला आहे.मार्गात कितीही अडचणी आणि संकटे आली तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. 

      जर माझ्या सहकाऱ्यांना तो काफीला पुढे नेता येत नसेल,तर तो तिथेच त्यांनी ठेवावा.पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना माझा संदेश आहे..

(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर. पृष्ठ. क्रं.550 – 551. पैरा – शेवटचा – पहिला.)

      उपरोक्त संदर्भीय भाषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वागत पर भाषणात केले होते त्या दरम्यान त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या आणि अन्नावरील वासना उडून ते अंथरुणावर निपजत पडून राहत.

        आपले स्वतःचे जन्मदाते माय – बाप ही ऐवढी माया, जिव्हाळा लावत नाही तेवढी माया,जिव्हाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःची चार मुले पैसे अभावी गमावून,आपणा सर्वाना पोटाशी धरले होते आणि स्वाभिमानाने जीवन जगा संदेश दिला होता,हे काय कमी आहे ? याही अवस्थेत त्यांनी त्यांचे कार्य थांबविले नाही.आणि आपले आजचे लाळचाटे भाडोत्री पुढारी सत्ताधारी संघाच्या पिलावळा सोबत पायात घुंगरू बांधून, समाजाशी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी गद्दारी करून नाच्या सारखे जीवन जगतांनी आपणास दिसत आहे.पण एक दिवस तरी समाजातील भाडोत्री पुढाऱ्याची नक्कीच कत्तलखान्याकडे वाटचाल होईल.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात:-

     तूमच्या आजच्या वाईट स्थितीतून मुक्त करण्याचे मी ठरवले आहे,आता आपणच सुज्ञ वाचक वर्गानी आपल्या सदविवेक बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहावे कोण आदर्श आहे ? एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर पुढे काय म्हणतात ते पहा –

    “माझ्या न्याय व लोक हिताच्या कामगिरीमध्ये मला कितीही त्रास झाला इतकेच नाही तर जवळच असलेल्या एखाद्या रस्त्यावरील कंदीलाच्या खांबावर मला कोणी तात्काळ फाशी दिली तरी मी त्याची मुळीच पर्वा करणार नाही. आजचा प्रश्न नुसता भावनांना वश होऊन सोडविण्याचा नसून गुलामगिरी कितपत असलेल्या असंख्य समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी……… मार्गाने सोडवयाचा प्रश्न आहे.

(संदर्भ – खंड.18 भाग – 1. पृष्ठ.353. पैरा – 3.)

     उपरोक्त संदर्भ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात: – एखाद्या रस्त्यावरील कंदीलाच्या खांबावर मला कोणी तात्काळ फाशी दिली तरी मी त्याची मुळीच पर्वा करणार नाही. ह्या त्यांच्या वाक्यावरून सर्वांनी लक्षात घेण्यासारखे आहे की,समाजासाठी बलिदान,जीव देणारे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर असे म्हणत असतील तर आपले जन्मदाते माय – बाप महान की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपणासाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहेत.

    आपल्या आजोबा – पणआजोबा ह्यांचा 70 – 80 वर्षा पूर्वीचा काळ आठवण करा.घरात खायला नसायचे,हाताला काम नसायचे अशावेळी आपल्या पूर्वज महार मेलेल्या ढोरांचे मांस काढून उन्हात वाळवून खात असत.

     ज्ञपण ही दयनीय अवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अफाट विद्वतेने ( चार पायऱ्यातून मिळवलेल्या ज्ञानातून नाही ) लिहिलेल्या संविधानात आपले अधिकार आणि सवलती देऊन नष्ट केली. त्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चार मुले जमिनीत गाडून,आपल्या प्रिय रमाईकडे दुर्लक्ष करून आपण सर्वांच्या जीवनात कल्पनातील बदल घडवून आणला.आता पोट भरून आहे तरीही संतुष्ट नाही त्यामुळे समाजातील भाडोत्री पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पायमल्ली करून ताटाखालचे मांजर होण्यासाठी, संघाच्या पिलावळा सोबत मांडीला मांडी लावून बसण्यासाठी मशगुल आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे.

     ज्ञानाशिवाय कृती आंधळी असते या युक्तीप्रमाणे ध्येयासाठी अविरत परिश्रम करून आपल्या अंगी असलेली शक्ती वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व आयुष्यभर सायास केले,साधना केली ती संपादन केलेली शक्ती गुलामगिरीत पडलेल्या आपल्या बांधवांच्या श्रृंखला तोडण्याच्या कार्ये व्यतित केली.त्यांचे कार्य म्हणजे त्यांचा श्वासोच्छ्वास होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

      प्रत्येक मनुष्याच्या अंगी हे गुण यावेत म्हणून ते म्हणतात –

     मनुष्याच्या अंगी जे काही थोरपण येते ते त्याच्या अखंड उद्योगशीलतेतून,तपश्चर्येतून ( ध्यान साधना नाही ) निर्माण होते. ” मी भोगलेल्या हालअपेष्टांची आणि कष्टांची तुम्हाला कल्पना यायची नाही.दुसऱ्या एखाद्या मनुष्याचा त्यात समूळ नाश झाला असता.

(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर पृष्ठ. क्रं.527. पैरा – शेवटचा पहिली ओळ.)

       समाजकार्याविषयी आपणास ओढ नसेल आणि तुम्ही कितीही उच्चशिक्षित झाला असाल ते कार्य कृतीशून्य,आहे.असा त्यांचा दृढ विश्वास होता.आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे सुशिक्षितांचे पहिले कर्तव्य आहे. बड्या हुद्याच्या जागी गेल्यावर या सुशिक्षितांना आपल्याच अशिक्षित बांधवांचा विसर पडतो कारण स्वतःच्या समाजाविषयी आपुलकीची भावना नाही, कळकळ,तळमळ नाही. 

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्या भाषणात उद्गार काढून म्हणायचे,असे जर आपले दुष्ट भावनेचे,अमिषा पोटीचे विचार असतील तर त्यांनी आपल्या या असंख्य बांधवांकडे योग्य लक्ष दिले नाही तर समाजाचा नक्कीच ऱ्हास होईल हिच भावना त्यांच्या मनी होती.

        “जागृती आणि जबाबदारी, प्रत्येक मनुष्याच्या अंगी वसलेली असावी हा पुढील धोक्याचा इशारा देऊन याबाबत ते म्हणतात – हिंदुस्थानच्या आजच्या परिस्थितीत जागृती व जबाबदारीची फार आवश्यकता आहे. युद्धोत्तर हिंदुस्थान पुढे मोठ मोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत……. ही भीती नाहीशी करण्यासाठी व आपणा पुढील प्रश्न सोडविण्यासाठी अल्पसंख्य व बहुसंख्य या दोन्ही लोकांत आपण ” जागृती व जबाबदारीची जाणीव ” उत्पन्न केली पाहिजे.

(संदर्भ – खंड.18 भाग – 2. पृष्ठ. क्रं.314. पैरा – पहिला.)

     उपरोक्त,_जागृती आणि जबाबदारी,सोबतच त्यांनी,”संघशक्तीने व स्वालंबनाने,समाजाचे प्रश्न कसे सुटतात आणि आपला समाज संख्येने किती बहुसंख्यांक आहे याचे उदाहरण देऊन याबद्दल बोलताना ते म्हणतात –

     आपल्या देशात आपले कष्टाने पोट भरणारे बांधव शेकडा 80 टक्के आहेत या संख्येच्या मानाने इतर वर्ग किती अल्प आहेत याची कल्पना करा. परंतु केवळ अज्ञानामुळे आणि या वरिष्ठ म्हणणाऱ्याच्या हाती सत्ता असल्यामुळे आपणासारख्या बहुसंख्यांक जनतेला ते शह देऊ शकतात. परंतु आपण सर्व लोक जागृत झालात. तुम्हाला तुमची हित कशात आहे हे ” संघशक्तीने व स्वावलंबनाने ” कळाव्यास लागले तर आपण एका चुटकीसरशी सर्वाधिकार आपल्या हाती घेऊ शकाल.

(संदर्भ – खंड.18 भाग – 2. पृष्ठ. क्रं.74 – 75. पैरा – शेवटचा व पहिला.)

     ज्ञडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपरोक्त वाक्य,”संघशक्तीने व स्वावलंबनाने,हे किती दूरदृष्टीच्या जबाबदारी पणामुळे त्यांनी उच्चारले आहेत.पण आज ते आजच्या घटकेला विस्कळीत झालेले आहे.गटागटात,पक्षापक्षात फुटीरता निर्माण झाली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गर्जना ही सिंहाच्या डरकाळी सारखी होती.

      ग्रीस सम्राट अलेक्झांडर ( सिकंदर ) याने भारतावर आक्रमण इ. स. पूर्व 325 मध्ये केले. त्यावेळी Alexander the great म्हणतो, ” I am not afraid of an army of lions led by a sheep. I am afraid of an army of sheeps led by lion..

अर्थात –

       मी सिंहाच्या फौजेला घाबरत नाही ज्याचे नेतृत्व शेळी करीत असेल.मी शेळीच्या फौजेला घाबरतो ज्याचा नेता सिंह असेल.

(संदर्भ – आंबेडकरी चळवळीची दिशा व दशा. लेखक – डॉ. कृष्णकांत डोंगरे. पृष्ठ. क्रं.98. पैरा,- पहिला.)

      भारत देशात माणुसकीला मुकलेल्या संपूर्ण बौद्ध समाजाला एका छत्राखाली आणण्यासाठी एक मजबूत संघटना तयार करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा,मनीषा होती.ही संघटना अशी जिवंत संस्था असेल की,जी बहुजन समाजाच्या वास्तविक भावनांचे मतप्रदर्शन करू शकेल.जिच्या छत्र छायेखाली समाजाचे खरे व निष्ठावान सचोटीचे कार्यकर्ते तयार होऊन देशभरातील सत्तेची स्थानिक काबीज करतील.ही त्यांची या मागची कल्पना होती.पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर बौद्ध समाजाच्या नेत्यांमध्ये विचाराची फुटीरता निर्माण होऊन शक्ले झालीत.

     हे बौद्ध समाजाचे दुर्दैव आणि त्यांच्या विचारांची पूर्णपणे पायमल्ली झाली असेच शोकाने म्हणावे लागेल.आंबेडकरी समाज यापूर्वी राजकीय दृष्ट्या दुभंगलेला असताना,धार्मिक दृष्टीनेही दुभंगला गेला.जगातला कोणताही समाज राजकीय दृष्ट्या विस्कळीत असला तरी तो धार्मिक दृष्ट्या एक असतो.

     अशाप्रकारे,”राजकारणात तसेच धर्मकारणात,गटबाजीला ऊत आलेला असताना,”काँग्रेस पक्षांनी,बौद्धांचे राजकीय लचके तोडलेत तर धार्मिक कार्यातील गटबाजीचा फायदा,_राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,निरनिराळे हिंदू धार्मिक उत्सव करून आणि त्याच बौद्धांना समाविष्ट करून घेऊन बौद्ध धम्मापासून परावृत्त करीत आहेत.अर्थात दोन्ही पक्ष एकाच बाजूच्या नाणे आहेत.हे प्रत्यक्ष दर्शनी आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोतच.शंका नाही.

      आजचे सत्तेसाठी भुकेलेले सिंहाचे छावे हे सुद्धा गटागटात विभक्त झालेला,”रिपब्लिकन पक्ष,मजबूत व संघटित करण्याऐवजी,दुसऱ्या पक्षाच्या ओंजळीने सत्तेचे खारे पाणी पिण्यास आसुसलेले दिसून येतात.ते आपला स्वतःचा स्वाभिमान व अस्मिता गमावून बसले आहेत.त्यामुळे बौद्ध जनता निराश व हवालदिल झालेली दिसून येत आहे. म्हणून आजच्या घटकेला आपला हितकर्ता कोण आहे ते ओळखणे गरजेचे आहे याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेखीत खंडात लाख मोलाचे मार्गदर्शन देऊन म्हणतात –

     असल्या फसव्या लोकांची यापुढे खरी पूजा पायाच्या ठोकरीने केली पाहिजे आणि आपला खरा हितकर्ता कोण हे निवडताना यापुढे फार सावधगिरी बाळगा. तुम्हाला बुद्धी प्राप्त झाली आहे. त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण , कोणता पक्ष तुमच्यासाठी प्राणाची ही पर्वा न करता जगण्यास समर्थ आहे याची तुम्हीच निवड करा.

(संदर्भ – खंड. क्रं.18. भाग – 2. पृष्ठ. क्रं.74 – 75. पैरा – शेवटचा व पहिला.)

                    संकलन 

               नितेंद्र जाधव सर