प्रस्तावना
विद्रोही अविनाश गोंडाणे
प्रकाशक
दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
प्रा.पंढरी सोपानराव बनसोडे सर यांचा “वाट समतेची” या कविता संग्रहाच्या निमित्ताने मी त्यांना मंगलमय सदिच्छा देतो.प्रा.बनसोडे सर यांना सुरुवातीपासुनच लेखनाची आवड आहे.सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,काही स्पर्धांचे आयोजन करणे अशा छंदाचे ते धनी आहेत.
त्यांनी काही गेय कविता,काही गीते,काही शोध निबंध लिहिलीत.ते सातत्याने कवितालेखन करित आहेत.प्रा.बनसोडे सर २०२२ पासून माझ्याशी जुळले आहेत.प्रस्तावना लेखन करतांना त्यांचा परिचय मांगितला.त्यांनी त्यांचा संक्षिप्त परिचय पाठविला.कुणीही अचंबित व्हावे असा तो आहे.त्यातील काही ठळक घटनांचा मी उल्लेख करणे अपरिहार्य समजतो.
ते महाराष्ट्रातील एकूणच साहित्य क्षेत्राशी निगडीत आहेत.अजूनही त्यांचा साहित्य क्षेत्रात वावर असतो.त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य लेखन केले आहे.यात प्रामुख्याने “तु घे भरारी”, “भारताचा पाया” ,”टाहो” (काव्य संग्रह) तसेच “आक्रोश ” (कथासंग्रह),”उध्वस्त” (कथासंग्रह), शोध निबंध प्रकाशित झाले आहेत.तसेच आगामी आकर्षण “पोस्ट मार्फत”(कादंबरी)”महात्मा गौतम बुद्धांचा विज्ञानवाद”(वैचारिक) ” माझी समिक्षा”(समिक्षा ग्रंथ) प्रकाशनाच्या वाटेवर आहे.त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.
‘स्वदेशी सन्मान पुरस्कार २०२४;’महामृत्यूंजय राज्यस्तरिय पुरस्कार २०२४; ‘संत नामदेव राष्ट्रीय काव्य पुरस्कार २०२४;’कवी अरुण काळे राज्यस्तरिय पुरस्कार; ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङमय पुरस्कार २०२४; ‘मुक्तछंद लेखणी गौरव राज्यस्तरीय पुरस्कार; ‘इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२४; ‘स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार २०२४; ‘स्व राजाराम डाकवे साहित्य पुरस्कार २०२५ (आक्रोश ); ‘तितिक्षा इंटरनॅशनल साहित्य पुरस्कार २०२५ ; ‘साहित्यरत्न जीवन गौरव साहित्य सन्मान २०२५;’स्वदेशी साहित्य सन्मान पुरस्कार ;” आक्रोश ” कथासंग्रहास ( तृतीय क्रमांक ) आदी पुरस्कार मिळाले आहेत.
कवितेमुळे माणसे जोडली जावीत,माणसें तोडण्याचे काम कविता किंवा कोणतेही साहित्य करित नाही.कविता ही केवळ भावनांची उधळण नसते,ती जीवनाचा कवितारुपी दस्तावेज,ती काळाची,समाजाची आणि माणसांच्या जगण्याची साक्ष देणारी,खऱ्या अर्थाने एक प्रत्यक्ष साक्षरुपी दस्तावेज असते.
लातूर येथील साहित्याचे धनी,एक सामाजिक जान असलेले कवी,प्रा.पंढरी सोपानराव बनसोडे यांचा “समतेची वाट ” हा कविता संग्रह समतेच्या जीवनाचा काव्य रुपी दस्तावेज आहे.
त्यांच्या कवितांमध्ये केवळ वैयक्तिक भावविश्व अथवा काल्पनिक भाव नसुन संपूर्ण समाजाच्या व्यथा,वेदना,अन्याय,अत्याचार,उपेक्षा आणि वंचितांच्या जगण्याच्या झुंजींचे प्रखर प्रतिबिंब दिसते.
कवीला त्यांच्या कवितारुपी साहित्यातून समाजामध्ये समतेची वाट निर्माण करण्याची एक तळमळ दिसून येते.त्यांचा कविता संग्रह एक अधोरेखित “समतेचा दस्तावेज” ठरेल.!
प्रा.बनसोडे सर यांच्या कवितेचा पहिला ठसा म्हणजे प्रामाणिकपणा,शब्दांमध्ये अढ्यायतेचा आडपडदा नाही.किंवा बनावटी,ओढून ताणून केलेल्या अलंकारांचा दिखावा नाही.ही भाषा जशी सामान्य माणसांच्या रोजच्या जीवन जगण्यात ऐकू येते.तशीच ती थेट त्यांच्या कवितेत शब्दरुपी उतरलेली आहे.
उध्दाणार्थ..
गरिबाचं आता काही चालणार नाही,श्रीमंतांची हि खरी लोकशाही…
फुले,शाहू,कर्मवीर आंबेडकर विसरु या,टाटा,बिर्ला,अंबानी,अडाणी, अदानी म्हणूया….
एल्गार पूकरणारकोण आता,पाय खोरुनी मरणे आता….
प्रा.बनसोडे सरांची ही कविता वाचकांना कार्यकर्त्यांचे तुटलेले आयुष्य त्यांच्या संघर्षातील थकवा,लागलेल्या ठेचा आणि राजकारणाच्या दलदलीत खेचलेली वंचितांची स्वप्ने हे सारे जणू आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.
न्याय,अधिकार,हक्काच्या लढाईसाठी संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्यालाच जेव्हा दोन वेळच्या सांजेसाठी झगडावं लागतं तेव्हा त्या वास्तवाला शब्द देणं म्हणजे मोठं धाडस आहे.आणि तेच धाडस प्रा.बनसोडे सरांनी दाखवलं आहे.!
“बाबा तुम्ही हवे होतात,पाठीवर हात ठेवून लढ म्हणला असता….
वंचितांसाठी धावलात नेहमी तुम्ही,कष्टकऱ्यांचा आवाज होता तुम्ही…”
येथे जनसामान्यांची मने दुभंगलेली आहेत. क्षणोक्षणी माणूस जात,धर्म,पंथात वाटल्या जात आहे. समाजामध्ये परिवर्तनाचे खरे काम कविताच करते.
प्रा.बनसोडे सरांच्या कवितेला एक सामाजिक वेदना आहे.त्यामुळेच त्यांच्या बहुतेक कविता या बाबासाहेबांना समर्पित आहेत.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच या जीवनाला खरा अर्थ आला आहे आणि लढण्याचं बळ मिळालं आहे असे ते कवितेतून बोलत आहेत.
शत्रू या कवितेतून ते म्हणतात.
“शत्रू आपला ओळखा रं..
उगाच कुणाच्या मागं जावू नका रं…
कुणाच्या भूल थापेस भूलू नका रं..
आमिषांना तुम्ही बळी पडू नका रं…
याच कविता संग्रहातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दारिद्र्य आणि संघर्षाची ठळक प्रतिमा…
“येथे मांडलाय डाव वेदनांचा…
येथे मांडलाय तमाशा विरहाचा…
येथे मांडलाय बाजार नात्यांचा…
येथे सुर्य लपतोय द्रारिंद्र्याचा…”
प्रा.बनसोडे सर आपल्या कवितेतून मोडकडीस आलेल्या झोपड्या,भुकेने कोसळलेली पोरं,हतबल स्त्रिया,मजुरीसाठी दारोदार भटकणारे हात,जीवन जगण्यातलं रोजचं मरणं….या साऱ्या प्रतिमा वाचकांना अस्वस्थ करतात.
पण कवी केवळ अस्वस्थतेवर थांबत नाही,तर तो त्या व्यवस्थेला थेट प्रश्न बनवतो.
” प्रतिष्ठेचा टेंबा मिरवणाऱ्यांची,ताटलीतील भाकरी पळवणाऱ्यांची,अत्याचार करुनी मोकाट फिरणाऱ्यांची,निर्दोष लोकांना तुरुंगात टाकणाऱ्याची “…
खुलेआमपणे कवितेतून लाताडतांना कवी दिसतो.व्यवस्थेला प्रश्न म्हणजे केवळ कल्पना रंजन नाही तर परिवर्तनाची तळमळ आहे.
प्रा.पंढरी सोपानराव बनसोडे सर यांच्या कवितेतून जाणवणारी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आंबेडकरी चळवळीतील विसंगतीचे प्रामाणिक चित्रण, कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी,राजकारणाच्या टपरीवर त्यांची झालेली दारुण हेटाळणी,आणि त्या संघर्षाची किंमत म्हणून मिळालेली फक्त उपेक्षा…. ही चित्रे वाचकाला धक्का देतात.क्षणभर स्तब्ध करतात.पण हे कटू सत्य उघड करणं हेच साहित्याचं खरं काम आहे.!
“मी निघालो बुद्धाच्या शोधात..
मी निघालो सत्याच्या शोधात..
मी निघालो आत्मशांतीच्या शोधात..
मी निघालो क्रांतीच्या शोधात..”
कवी बुध्दाला शोधत सत्याच्या शोधात निघाले आणि आत्मशांतीच्या शोधात असतांनाच त्यांना क्रांतीच्या शोधात निघावं लागले.. आणि पुढे…
“मी पुन्हा निघालो धम्माच्या शोधात…
मी पुन्हा निघालो संघाच्या शोधात….
मी झुकलो फक्त बुध्दाच्या चरणात”……
या कवितेतून भावनांचा क्षणचित्रात्मक आविष्कार साधता येतो, पण कवितेत विचारांचा प्रवाह अनुभवांचे स्तर,आणि काळाचे दर्शन या सगळ्यांचा संगोपन परिणाम साधावा लागतो.प्रा.बनसोडे सरांच्या कवितांनी हा कसोटीचा टप्पा समर्थपणे पार केला आहे.त्यांचा कविता संग्रह म्हणजे “एका संपूर्ण पिढीच्या संघर्षाचा काव्यरुपी दस्तावेज आहे “…
या कवितांचा समाजाशी असलेला संवादही लक्षवेधी आहे.वर्तमानातील राजकारणाने,खाजगीकरणाने,राजकीय उन्मादाने,सांस्कृतिक विसंगतीने सामान्य माणसाचे जगणे अतिशय असाह्य आणि आणखीनच कठीण केले आहे.अशावेळी या कविता वाचकालाच थेट प्रश्न विचारता. वंचितांच्या वेदनांवर उपचार कोण करेल? न्याय कोण देणार?कविता सरळ उत्तर देत नाहीत.पण त्या उत्तरांच्या शोधासाठी वाचकाला अंतर्मुख करतात.हिच खरी आंबेडकरी साहित्याची ताकद आहे.
म्हणुनच प्रा.बनसोडे सर हे कवितेच्या प्रांतातील अस्सल खणखणीत चमकदार “हिरा” आहे.!
कवितांच्या भाषेबद्दल बोलायचं झालं तर ती थेट जमिनीवरच्या बोलीशी संवाद साधणारी आहे.प्रतिमांचा साधेपणा असूनही त्यांचा प्रभाव खोलवर रुजला जातो.बनसोडे सरांच्या कवितेतील शब्दांची ताकद इतकी आहे की,ह्या कविता ओठातून आल्या नाहीत तर त्या पोटातून बाहेर आल्या आहेत.आणि पोटातून आलेल्या कविता ह्या अस्वस्थ करून सोडतात.मन सुन्न करुन सोडतात.मेंदूला गदगद हलवितात.त्यांच्या भाषेतील टवटवी आणि प्रतिमांमधील तीव्रता या कविता संग्रहाला वेगवेगळेपणा देते.
मी एक साहित्यिक, लेखक म्हणून मला आनंद आहे की मी या कविता संग्रहाचा पाठीराखा आहे.आणि या कविता संग्रहाला माझी प्रास्तावणा आहे याचा मला अभिमान आहे.माझ्यासाठी केवळ औपचारिक काम नाही तर एक नैतिक बांधिलकी आणि जबाबदारी आहे.कारण या कवितांमधून उमटणारा आवाज हा खरं तर जनतेचा, शोषितांचा सशक्त बुलंद आवाज आहे.हा कविता संग्रह वाचकांच्या हृदयात प्रश्न निर्माण करेल.कधी डोळ्यात अश्रू आणेल,कधी मनात आशेची ठिणगी पेटवेल,कधी एल्गार पुकारेल.. कधी न्याय,बंधुता,समता निर्माण करेल.याहून मोठं काव्याचं काम काय असू शकतो?
माझा ठाम विश्वास आहे की प्रा.पंढरी सोपानराव बनसोडे सरांचा हा कविता संग्रह वाचकांना केवळ भावनिक स्तरावर भिडणार नाही,तर तो त्यांना विचार करण्यास भाग पाडेल.आणि विचारापासूनच कॄतीच्या बदलाचा,परिवर्तनाच्या नवक्रांतीचा जन्म होतो.
प्रस्तावना तुम्हीचं लिहा तसेच मुखपृष्ठ,अंतिम पृष्ठ या कविता संग्रहास देऊन साज चढवा असे म्हणतांना त्यांच्या मधील निरागस हट्ट मला दिसला.आणि प्रास्तावना लिहून त्यांचा हट्ट मी पूर्ण केला.
या प्रास्तावनेचा अर्थ इतकाच आहे.प्रा.बनसोडे सरांच्या पुढच्या कविता संग्रह निर्मितीस मी मंगलमय सदिच्छा देतो..थांबतो.. धन्यवाद.!!



