शिवसेना एकनाथ शिंदेचीच,निकालाचे आतषबाजी करीत अलंकापुरीत जल्लोषात स्वागत…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल आज लागला. याच पार्श्वभूमीवर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कामाला प्रेरित होऊन शिवसेनेसोबत आलेल्या तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आळंदीत इंद्रायणी नदी काठी येथे शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फटाक्यांची आतशबाजी करीत व इंद्रायणीमातेची महाआरती करून मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला. यावेळी उपतालुकाप्रमुख योगेश पगडे, शंकर घेनंद, संदीप पगडे, तुकाराम ताजणे, दिनकर तांबे, रोहीदास कदम, ज्ञानेश्वर घुंडरे, गोविंद ठाकूर उपस्थित होते. 

               आळंदी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण म्हणाले की, “हा ऐतिहासिक निकाल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापित केलेले सरकार हे कायद्याद्वारे व संविधानिक तत्वाने स्थापन झालेले सरकार आहे. न्यायदेवतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य असून, इथून पुढे सरकार अजून नव्या ऊर्जेने काम करेल.”

             बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकृतपणे काल संध्याकाळी 6 वाजता वाजता जाहीर केला. यामध्ये शिवसेनेतील सर्व आमदार पात्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेलं सरकार हे पूर्णपणे संविधानिक व कायद्याने बनलेले सरकार आहे असे जाहीर झाले आहे.