राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली रब्बी पणन हंगाम २०२४-२५ मधील धान व भरडधान्य खरेदीसाठी केंद्र शासनाकडून २० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे.ही मुदतवाढ आमदार रामदास मसराम यांच्या ठाम आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली,असे सांगण्यात येत आहे.
आमदार रामदास मसराम यांनी यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या सचिव श्रीमती सारंग मॅडम, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, तसेच गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मा. योगेश कदम यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन ठाम शब्दात सांगितले. “तुम्ही काहीही करा, पण आम्हाला शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ हवीच!”
यावेळी मंत्री महोदयांनी त्वरित भारत सरकारच्या सहसचिव श्रीमती सी. शशिखा (नवी दिल्ली) आणि राज्य सरकारचे सचिव श्री.विकास राऊत (महाराष्ट्र राज्य) यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
मुदतवाढीचा निर्णय शासनाकडून पूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय व परिपत्रकातील तरतुदींचे अनुपालन करूनच घेण्यात आला आहे. त्यामुळे २० जुलै २०२५ पर्यंत धान व भरडधान्य खरेदी शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आ. रामदास मसराम यांची ही भूमिका अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे.



