१२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ कार्यक्रम महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.आळंदी येथे घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे सोमवार,१२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम होईल.

              राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यांप्रमाणे इंद्रायणीमध्येही विसर्जन झाले. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीमधे दि. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्यांची स्मृती म्हणून रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. ७६ वर्ष ही परंपरा सुरु आहे.

           यावर्षीसुद्धा हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इंद्रायणी नदीच्या घाटावर सकाळी ठीक साडेआठ वाजता हा कार्यक्रम होईल. ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव संदीप बर्वे, विश्वस्त अन्वर राजन, देवराम ढुंडरे-पाटील, आळंदी नगर पालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, गणपतराव कुऱ्हाडे, नंदकुमार वडगावकर आदी उपस्थित राहणार आहेत.