प्रमुख विश्वस्तांच्या वक्तव्यामुळे आळंदीकर ग्रामस्थ आक्रमक… — विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने आळंदी बंद वर ग्रामस्थ ठाम…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत आळंदी ग्रामस्थांना विश्वस्तपदी डावलल्याने मंगळवार (दि.०५) डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या आळंदी बंद बाबात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आळंदीकरांचा अपमान केला असुन त्यांनी आळंदी ग्रामस्थांची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आळंदी ग्रामस्थांनी दिला आहे.

            आळंदी पोलिस स्टेशन मध्ये आळंदी बंद बाबात आळंदी ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्यात बैठक बोलवण्यात आली होती, यामध्ये पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी आळंदीकर ग्रामस्थांशी संवाद साधला.

              यावेळी डि.डि.भोसले पा.बबनराव कुऱ्हाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, अशोक उमरगेकर, साहेबराव कुऱ्हाडे, संजय घुंडरे, विष्णू वाघमारे, राहुल चव्हाण, पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केलेल्या वक्तव्याने आळंदीकर ग्रामस्थांचा अपमान झाला आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने पुकारण्यात आलेल्या आळंदी बंद वर ठाम असल्याचे सर्व आळंदीकर ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला सांगितले.

              कार्तिक वद्य अष्टमी निमित्ताने उद्या सकाळी नऊ वाजता श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजनाने कार्तिकी यात्रास सुरुवात होणार आहे. परंपरेनुसार चालत आलेल्या सर्व धार्मिक विधीसाठी आळंदी ग्रामस्थांचा विरोध असणार नाही. निषेध मोर्चा सकाळी दहा वाजता चाकण चौक येथून सुरू होऊन प्रदक्षिणा मार्गावरून महाद्वार चौकात येईल तिथेच निषेध सभेचे आयोजन करण्यात येणार असून पुढील आंदोलनाची दिशा त्याच दिवशी जाहीर करण्यात येईल असे आळंदी ग्रामस्थांनी सांगितले आहे.

              आळंदी बंद बाबतीत आळंदीकर ग्रामस्थांच्या ज्या भावना आहे त्या वरिष्ठांना कळविण्यात येईल तसेच कार्तिकी यात्रेसाठी आळंदीत येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.