रोखठोक
प्रा.महेश पानसे.
रेती चोर व माफिया नदी,नाल्यांचे चिरहरण करण्यात तरबेज झालेच आहेत.कायद्याची ऐशीतैशी करून पशू सारखे व्यवहार करणारे हे तस्कर आता निहीत स्वार्थाकरीता माणूसकी गमावून बसल्याचे मूल तालुक्यातील विदारक चित्र समोर आले आहे.
मूल शहराला पुरस्थितीपासून संरक्षण देणाऱ्या न.प.ने बांधलेल्या माती कामावरच रेती चोरांनी जेसीबी चालवून बेशरमगिरीची हद्द ओलांडल्याचे चित्र पुढे आले आहे.
अर्धेअधीक मूल शहर पावसाळ्यात पुर स्थितीत सुरक्षीत राहावे याकरिता नगर परिषदेने उपाययोजना करून लगतच्या वन जमिनीवर मोठे मातीकाम करून शहरात घुसणारा पाण्याचा लोंढा थांबविला.गत दोन सालापासून पूरसदृश्य परिस्थितीपासून शहर वासियांना हायसे वाटत असतानाच मूल च्या रेतीमाफीयांनी चोरीचा माल चोरमार्गाने बाहेर काढण्याकरिता अक्षरशः जेसीबी लावून न.प.ने बांधलेल्या पारींची अक्षरशः वाट लावून मूल शहराला पुराच्या पाण्यात कोंबण्याचे पाप केल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे.
मूल न.प.ने केलेल्या पारींना दोन ठिकाणी भगदाड पाडून वनविभागाचे हद्दीत 1 कि.मी.लांबीचा चोरमार्ग करण्यात येऊन रेती चोरांनी कोसंबी व चिंचोली घाटातून हजारो ब़ास रेती वाहतूक केलेली दिसते.
न.प.ने बांधलेल्या पारी फोडल्याने भर पावसाळ्यात शहरात हाहाकार माजेल याचेही भान नसलेल्या रेती चोरांनी लाज,शरमेसह माणुसकी गमावली काय? हा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे.
मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालया लगत वनविभाग व वनविकास महामंडळ क्षेत्रात पसरलेल्या डोंगराळ भागातून पाण्याचा मोठा लोंढा शहरात घुसल्याने 2022 व 2023 मध्ये जवळपास 800 घरांमध्ये पाणी घुसल्याने हाहाकार माजला होता.
नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते.तत्कालीन मुख्याधिकारी पवार व दोडे यांनी पुढाकार घेऊन शहरात घुसणारा पाण्याचा लोंढा जंगलात वळता करण्याकरिता मातीच्या मोठ्या पारी बांधून नगराला दिलासा दिला होता.
निश्चिंत झालेल्या नगर वासियांच्या सुरक्षतेवर या रेतीचोरांचा ‘मळा’ जाऊन पुन्हा पुर स्थितीचा धोका उदभवण्याची भिती निर्माण झालेली दिसते.
हे तर अक्षम्य दुर्लक्ष?
वनविभागानचे हद्दीवर व वनविकास महामंडळाचे हद्दीतून रेतीमाफीया मोठ्या वाहनांकरीता 10 ते 12 फुट बंदीचा व अंदाजे 1 कि.मी.लांबीचा चोरमार्ग बनवितात.कित्येक दिवस या चोरमार्गावरून हजारो ब़ास रेतीची वाहतूक केली जाते.एकतर हे अक्षम्य दुर्लक्ष किंवा मग मिलीभगत याशिवाय दुसरे काय?
ज्या क्षेत्रात परवानगी शिवाय काहीच करता येत नाही त्याच परिसरात रेतीमाफीया जेसिबी लाऊन बांधलेल्या पारी फोडून अक्षरश किलोमीटर लांबीचा चोर रस्ता बनवितात.शेकडो गाड्या रेतीचा वाहतूक करतात पण संबधित कर्मचारी व अधिकारी यांच्या नाकावरची माशी उडत नसेल तर मोठे नवलच समजले जाईल.
मूल न.प.च्या तत्कालीन मुख्याधिकारी यांनी पुढाकार घेऊन सदर उपाययोजना केली ही समाधानाची बाब असली तरी अधामधात न.प.च्या संबंधित अधिकारी वा कर्मचारी यांनी लक्ष देणे गरजेचे नाही का? हा सवालही उपस्थित होतोच.
रेती चोर तर बेशरम झालेत,पण संबंधित विभागाचे अधिकारी व न.प.चे विद्यमान पदाधिकारी संवेदनशील नसले तर भविष्यात उदभवणाऱ्या संकटाचा सामना करणे जड जाणार हे निश्चित.


