कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीच समर्थन कधी करत नाही :- शरद पवार… — राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनाचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक 

पुणे विभागीय 

आळंदी : भागवत वारकरी संमेलन ही संकल्पना माणूसकी घराघरात पोहोचविण्याचा संदेश करते. आज समाजामध्ये एक अस्वस्थता आहे. चुकीच्या प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची भूमिका काही घटक घेत आहेत. त्यामुळे सामान्य माणूस जो अस्वस्थ आहे त्याची अस्वस्थता काढून टाकण्यासाठी त्याला मानसिक समाधान देण्यासाठी त्याचं मन शक्तिमान करण्यासाठी जो काही पर्याय समाजासमोर आहे त्याच्यामध्ये भागवत वारकरी संमेलनाचा विचार आपण दुर्लक्षित करू शकत नाहीत. आज सबंध देशामध्ये वेगवेगळे घटक, वेगवेगळ्या पद्धतीने आपली पावलं टाकत आहेत. पण दुसऱ्या बाजूने अन्याय, अत्याचार हे चित्र एका बाजूला, धर्म आणि कट्टर विचाराच्या माध्यमातून कर्मकांड आणि या गोष्टींचा पुरस्कार ही भूमिका दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळते. माझ्या मते कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीच समर्थन कधी करत नाही. चुकीचे संस्कार कधी समाजावर करत नाही. योग्य विचार देण्याच्या संबंधित खबरदारी घेतो असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आळंदी येथे बोलताना व्यक्त केले.

        भागवत वारकरी महासंघाच्या माध्यमातून आयोजित राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच अभ्यासू वारकऱ्यांचा सन्मान यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दिनकर शास्त्री भुकेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, डॉ.अमोल कोल्हे, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, विलास लांडे, प्रकाश म्हस्के, बबनराव कुऱ्हाडे, तुषार कामठे, विकास लवांडे, शामसुंदर महाराज सोन्नर, सतीश काळे तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व महाराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

          त्यापूर्वी शरद पवार हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेणार असून, त्यांच्या हस्ते हजेरी मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन देखील करण्यात आले यावेळी आळंदीकर ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.

       आपला देश अनेक जाती-धर्मांचा भाषेचा असला तरी त्याचा मूळ विचार जो आहे तो विचार हिंदूंचा असो की मुस्लिमांचा की अन्य घटनकांचा असो त्यांच्यामध्ये एक प्रकारचे सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका प्रकर्षाणे मांडली जाते. त्याचाच पुरस्कार करणे, ते रुजवणं, ते शक्तिशाली करणे आज खऱ्या अर्थाने आवश्यक आहे. ती आवश्यकता भागवत वारकरी संमेलनाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजवू शकतो, असे शरद पवार म्हणाले.

           आज सबंध देशामध्ये एका बाजूला सनातन धर्म आणि दुसऱ्या बाजूला भागवत धर्म यासंबंधीची चर्चा हल्ली मोठ्या प्रमाणावर होत असते. मी एकच गोष्ट सांगतो, आम्ही याकडे बघत असताना सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी विचारधारा आहे. समाजाला शक्तिशाली करणारी ही विचारधारा आहे. देशाला कष्टकऱ्यांची महासत्ता बनवणारी जी विचारधारा ती विचारधारा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अंतिम विचारधारा आहे. ही विचारधारा वारकरी संस्थान आहे. ती विचारधारा जतन करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे, असेही पवार म्हणाले.