ग्रामीण जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा नळ योजनेअंतर्गत कंत्राटी कामगारांचे कंत्राटदारांकडून आर्थिक शोषण… — कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ. न्याय द्यावा अन्यथा पाणीपुरवठा बंद पाडून तीव्र आंदोलन करण्याचा कामगारांचा इशारा…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

          मुल:- ग्रामीण जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा नळ योजनेअंतर्गत कंत्राटी कामगार मागील वीस वर्षापासून नियमित काम करत आहेत. परंतु ताराचंद देऊरमले या ठेकेदाराच्या व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सदर योजनेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे आर्थिक व शारीरिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत असून सदर कामगारांना श्री.ताराचंद देऊरमले हा ठेकेदार गुलामासारखे वागवण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर कामगार अर्धकुशल असून त्यांना कामगार कायद्याच्या नियमाप्रमाणे किमान वेतन देणे, हजेरी मस्टरवर सह्या घेणे, बँक अकाउंटवर दर महिन्याला वेतन जमा करणे, कामगारांचे पीएफ कपात करणे, कामगारांना ओळखपत्र देणे, त्यांच्या सुरक्षेसाठी ड्रेस कोड व सेफ्टी साहित्य देणे हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु सदर ठेकेदार त्यांना निम्म्या वेतनात काम करून घेतात व त्यांच्या पेमेंट वाउचरवर खोट्या स्वाक्षऱ्या करून तीन तीन महिने वेतन देत नाही. तसेच कंत्राटदार सात आठ हजारात २४ तास काम करून घेतात आणि वारंवार कामगारांना कामावरून काढण्याच्या धमक्या देतात. ठेकेदाराच्या व अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य कामगारांचे कुटुंब उध्वस्त होत असून त्यांच्या जगण्याचा हक्क कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून हिरावण्यात येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कामगारांवर अन्याय करणारी आहे. संबंधित प्रशासकीय स्तरावरून तात्काळ कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून द्यावे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा काँग्रेसचे युवा नेते प्रशांत उराडे यांनी संबंधित प्रशासनाला दिला. निवेदन देताना प्रशांत उराडे, रवींद्र राऊत, महेश निकुरे, रवी कंटीवार, दिलीप पाल, मुरलीधर सोपनकर, सुभाष उपरीवार, खुशाल वासेकर तथा ईतर कामगार उपस्थित होते.