Home Maharashtra मनपात सेवा हक्क दिन साजरा…

मनपात सेवा हक्क दिन साजरा…

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका  

चंद्रपूर २९ एप्रिल – शासनाच्या विविध सेवा वेळेत मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे व त्या सेवा निश्चित वेळेत त्यांना देणे ही शासनाच्या विविध विभागांची जबाबदारी आहे.तेव्हा चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांनी त्यांच्या विभागाच्या अधिसुचित सेवा नागरिकांना विहित कालमर्यादेत देण्याच्या सुचना मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी केले.

     मनपा राणी हिराई सभागृहात मनपा प्रशासनाच्या वतीने आयोजित सेवा हक्क दिन (२८ एप्रिल) कार्यक्रमात ते बोलत होते.नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार यावे लागु नये,म्हणून जास्तीत जास्त सेवा ह्या ऑनलाईन झाल्या आहेत.

           त्यामुळे कार्यालयीन कामकाजाचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे.मात्र या सेवा ऑनलाईन असल्या तरी संबंधित अधिका-यांनी नागरिकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढणे बंधनकारक आहे.

 

       शासन स्तरावरून दर महिन्याला याचा आढावा घेतला जातो.अर्ज निकाली काढण्याची शासकीय विभागांची गती कशी आहे,याचा मागोवा घेतला जातो.त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा देणे आपले कर्तव्य असल्याचे आयुक्त अकुनुरी नरेश यांनी सांगितले.याप्रसंगी सेवेची बांधिलकी मानणारी शपथ सर्व मनपा अधीकारी कर्मचाऱ्यांद्वारे घेण्यात आली.  

       सेवा हक्क दिन (२८ एप्रिल) हा महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५’ अंतर्गत नागरिकांना सरकारी सेवा वेळेत,पारदर्शक आणि जबाबदारीने मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो. २८ एप्रिल २०१५ रोजी हा कायदा अंमलात आला,ज्याद्वारे अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा या निश्चित कालमर्यादेत मिळणे नागरिकांचा कायदेशीर अधिकार बनले आहे.