बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर मध्ये पावसाने नुकसान झालेले पिकांची पाहणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
राज्यात ज्या भागात नुकसान झाले आहे त्या ठिकाणी कर्ज वसुली थांबलीच पाहिजे. राज्य सरकार बँकांना तशा सूचना देईल. 2215 कोटी रुपये काल शासनाने जमा केले आहेत. अजून आकडे वाढत आहेत. ती सुद्धा मदत लगेच मिळेल.
दिवाळीच्या आधी कुठलीही मदत राहणार नाही. मात्र कोणत्याही शेतकऱ्याने नुकसानीचे फोटो पाठवणे गरजेचे नाही. आमच्या विभागाचे कृषि आणि महसूलचे कर्मचारी स्वतः बांधावर जाऊन पंचनामे करतील. अशी महत्त्वाची माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते.
राज्यात पावसामुळे खूप नुकसान झाले आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून यात शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. जालनामध्ये 2 लाख 54 एकर क्षेत्रात नुकसान झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका नांदेडमध्ये बसला आहे. त्याचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहे. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करणार आहेत. नुकसान भरपाई लवकरच मिळेल, असा प्रयत्न सुरू आहे. असेही दत्तात्रय भरणे म्हणाले.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. आतापर्यंत 31लाख 64 हजार शेतकऱ्यांना ही मदत मंजूर झाली आहे.
ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होईल. स्थानिक प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार युद्धपातळीवर मदतकार्य करत असून, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता आणण्याचे आश्वासन दिले आहे. पुढच्या आठ ते दहा दिवसांमधे हे पैसे जे आहेत ते त्याठिकाणी आम्ही जमा करणार आहोत, असे सांगण्यात आले.
राज्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरु असल्याने शेतकरी आणि विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यात मागणी केली जात आहे. याबाबत विचारले असता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, परिस्थितीचा अंदाज घेतला जात आहे. अजून पाऊस सुरुच आहे. सगळा विचार करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.



