Home Maharashtra शहरात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) नागरिकांना सतर्कतेचा इशारा….

शहरात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) नागरिकांना सतर्कतेचा इशारा….

प्रेम गावंडे

उपसंपादक

चंद्रपूर 29 एप्रिल – चंद्रपूर शहरात उष्णतेची लाट सुरु असुन तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पार झाले आहे व सातत्याने वाढत आहे.उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यास सतर्क राहण्याचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे.

    तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांनी सांगीतले की,गत काही दिवसात दैनंदिन तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम शरीरावर होत असून योग्य काळजी घेतली नाही तर उष्माघाताचा धोका होऊन कधीकधी मृत्यु ही होऊ शकतो.त्यामुळे उष्माघात टाळण्यास नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.  

उष्माघातासंदर्भात आजाराची लक्षणे….

    चक्कर येऊन पडणे,झटके येणे,झोपेतून उठण्यास त्रास होणे / उठता न येणे,गोंधळल्यासारखे बोलणे / वागणे,श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे,शरिराचे तापमान 105 अंशा पेक्षा अधिक होणे,स्नायूत पेटके येणे,चिडचीड होणे,डोकेदुखी,अशक्तपणा येणे,मळमळ व उलटी होणे,अधिक घाम येणे,थकवा येणे.

बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता,काय करावे? 

    पुरेसे पाणी प्यावे,तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या,घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा,दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा,सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा,हलकी,पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरा,प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा,उन्हात काम करीत असल्यास टोपी,छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके,मान, चेहरा झाकण्यात यावा,शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस,घरी बनवण्यात आलेली लस्सी,कैरीचे पन्हे,लिंबू-पाणी,ताक इत्यादीचा वापर नियमित करावा,अशक्तपणा,डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा,गुरांना व पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे,सूर्यप्रकाशाचा थेट संबध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे,सकाळच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करावा तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

काय करू नये….

       उन्हात अतिकष्टाची कामे करू नका,दारू,चहा,कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका,दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा,उच्च प्रथिने युक्त आणि शिळे अन्न खाऊ नये,लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये,गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावी.