कापूसाचे भाव का म्हणून पाडले? — शेतकऱ्यांचे मुडदे पाडायचे आहेत काय?

    रोहन आदेवार

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

  यवतमाळ/वर्धा..

             योग्य भाव नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले असतांना त्यांच्या भाववाड समस्यांकडे महाराष्ट्र सरकार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येत आहे.

           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यकाळात कधी नव्हे येवढे भाव कापसाचे पडले आहेत.लागलेला खर्च सुद्धा निघालेला नाही.हे वास्तव्य लक्षात घेता प्रती क्विंटल १० हजार रुपये कापसाला भाव असने गरजेचे होते‌‌.

        मात्र,कापसाला योग्य भाव न देता कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मुडदे महाराष्ट्र सरकार पाडणार आहे काय?असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा महाराष्ट्र शासनाला आहे.

         कापूस हे विदर्भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यात यवतमाळ जिल्ह्या पांढऱ्या सोन्यासाठी सर्व दूर परिचित आहे.यंदा झालेल्या पावसाने कापूस उत्पादकांची चांगलीच कंबर मोडली. 

        कसेबसे सावरून पिकं क्षेत्र वाढवले.मात्र,म्हणावं तेवढे उत्पन्न मिळालं नाही.त्यात सध्या बाजारभाव देखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

        शेतकरी वर्षभर दिवसरात्र एक करत शेतीमध्ये पिकांची लागवड करतात.यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतले त्यामधून अधिक नफा हाती येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.मात्र,कापसाचे दर वाढत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले असून सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. 

        यावर लोकप्रतिनिधी सुद्धा गप्प बसून असल्याने सध्यातरी शेतकऱ्यांचे मागण्या अंधातरी आहे.

        अलीकडील काळात यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.जास्त पावसामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेती संदर्भात अत्यावश्यक बाबींच्या,कृषी निविष्ठा,खत,बी – बीयाणे व मजुरी यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

        पण,त्याप्रमाणात शेतमालांचे भाव का वाढत नाही? याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला भाववाढ नसल्याने घरातच पडून आहे.डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे.

        परंतू खर्च भागविण्यासाठी कमी दरातच कापूस विकावा लागत असल्याची खंत येथील शेतकरी बोलून दाखवित आहे.कापूस पिकाला पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही.दहा वर्षांपूर्वी जे भाव होते त्याच प्रमाणात आजही भाव आहेत. दहा वर्षांपूर्वी इतर वस्तूचे जे भाव होते त्या भावात मात्र कमालाची वाढ झाली आहे.

         आता कापूस ६४०० ते ६८०० रुपये क्विंटलने विकावा लागत आहे.शेतमालाचे भाव वाढले की सर्वांचेच लक्ष त्या भाववाढीकडे असते. शेतमालाचे भाव वाढल्याची ओरड होते, पण दुसरीकडे शेतमालाचे भाव गडगडतात तेव्हा मात्र त्याकडे कोणाचेच लक्ष नसते व तेव्हा त्या गोष्टीचा पाहिजे तसा गवगवाही होत नाही. 

        कापसाच्या लागवड खर्चापेक्षा,कमी खर्चाचे कपास पीक हातात येत असल्याने उदरनिर्वाह कसा करायचा,हा प्रश्न कापूस उत्पादकांसमोर आहे.