न्याय हक्कांसाठी लढा देणारे आरोग्य कर्मचारी मंत्र्यांना दिसत नाही का?… — महाराष्ट्र शासन झोपेचे सोंग घेऊन जगते का?… — समायोजन होईपर्यंत ‘सैनिक समाज पार्टी’ शांत बसणार नाही…

प्रितम जनबंधु

   संपादक

          गडचिरोली :- महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील विविध आस्थापनामध्ये कंत्राटी पध्दतीने मागील अनेक वर्षेपासून जिवाची पर्वा न करता अविरतपणे जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे. अशी मागणी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली असुन सैनिक समाज पार्टीच्या वतीने पुर्णतः जाहीर पाठिंबा दिला आहे.

           मागील अनेक वर्षांपासून आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागात कोविड काळातही अविरत आरोग्य सेवा देणाऱ्या, कंत्राटी पध्दतीने रुग्णालयीन सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ समायोजन करण्यात यावे.

                दिनांक १६ आक्टोबर २०२३ पासून नागपूर येथील संविधान चौकात एक दिवसाचा ईशारा मोर्चा करण्यात आल्यानंतर १७ आक्टोबर ते २३ आक्टोबर २०२३ पर्यंत असहकार आंदोलन सुरू असतांनाही महाराष्ट्र राज्य शासनाने योग्य पद्धतीने दखल घेतलेली दिसत नाही. त्यासाठी गडचिरोली येथे दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ पासून संपूर्ण कामबंद आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सहभागी होणार आहेत.

              मागील अनेक वर्षांपासून आरोग्य विभागात अनेकविध आस्थापनेत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी कर्तव्यरुपाने सेवा देत असताना आपल्या जीवाचे बलीदान झाले आहे तरीही महाराष्ट्र शासनाला जाग आली नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. २० मार्च २०२३ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी तसेच यापूर्वी कार्यरत असलेल्या अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आमदार आणि खासदारांनी नियमित समायोजन करण्याचे आश्वासन दिले मात्र भाषणात केवळ आश्वासन देऊन मोकळे होणारे सर्वच नेते अपयशी ठरले आहे.

             राष्ट्रीय आरोग्य अभियान हा भारत सरकारचा उपक्रम असुन त्यातील ओडिशा, पंजाब, राजस्थान, मणिपूर, मध्यप्रदेश सारख्या राज्यातील शासनाने आरोग्य कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली आहे.

                मात्र महाराष्ट्र शासनाला अजूनही जाग येत नसेल तर किती बेजबाबदारपणा असेल याची प्रचिती येते. दिनांक २५ आक्टोबर पासून संपूर्ण कामबंद आंदोलन करण्यात येणार असून या जनहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आंदोलनात सर्व संघटनांनी सहभागी व्हावे.

             तसेच कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित समायोजन केले नाही तर दिनांक ३० आणि ३१ आक्टोबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनात सहभागी व्हावे.

              असे आवाहन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी समायोजन कृती समितीचे समन्वयक निलेश सुभेदार, अमिता नागदेवते, लीयाज पठाण, डॉ. शितल टेंभुर्णे, डॉ. मोरे, रचना फुलझेले, डॉ. दीक्षांत मेश्राम, वैशाली बोबाटे, अस्मिता लोणारे, वर्षा कोलते, सारिका तिजारे, शर्मिला जनबंधु, नेत्रा कोलते, शुभांगी सुरमवार, अपर्णा पेशट्टीवार, ममता मेश्राम आदींसहीत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व समन्वयकांनी केलेले आहे.

            राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन करण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे वतीने करण्यात आली आहे.