‘स्वच्छतादूतां’मुळे उन्हात-पावसात वारकऱ्यांची वारी ‘हरित’ करण्यासोबतच होतेय ‘निर्मल’!..

 

नीरा नरसिंहपूर दि. 25

प्रतिनिधी – बाळासाहेब सुतार

“स्वच्छतेचा टिळा लावुनिया भाळी देतोया आरोळी पंढरीला।”

देहू आणि आळंदीतून अनुक्रमे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांन समवेत लाखो वारकऱ्यांची वारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमधून जाणाऱ्या या वारकऱ्यांचे आणि पालख्यांचे स्वागत जल्लोषात होत आहे. ठिकठिकाणी या वारकऱ्यांचा चहा, नाश्ता, जेवण, मालिश अशा माध्यमातून सेवा देण्यात स्थानिक मंडळी हिरीरीने पुढाकार घेत आहेत. वेगवेगळ्या उपक्रमातून या दिंड्यांचा रोजचा मार्गक्रमण सुकर होत असला तरी या दिंड्यांसोबतच वारी करणाऱ्या ‘स्वच्छतादूतां’मुळे उन्हात-पावसात वारकऱ्यांची वारी ‘हरित’ करण्यासोबतच ‘निर्मल’ करण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य सुकर होत आहे. 

          पुणे जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांसाठी स्वच्छतेची सुविधा देण्यासाठी विशेष फिरते शौचालय अथवा मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे वारकऱ्यांच्या शौचालयाची अडचण दूर झाली असून या व्यवस्थेबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 8 जूनपासून संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान देहूतून झाले. यानंतर लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी गवळ्याची, बारामती, सणसर, अंथुर्णे, निमगाव केतकीमार्गे इंदापूर सराटी मुक्कामानंतर सोलापूर जिल्ह्यात रविवार दिनांक 24 रोजी प्रवेश केला आहे.  

        संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 1000 मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली असून शेकडो स्वच्छता कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत. हे सर्व सफाई कर्मचारी वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी हजर असतात. तीन शिफ्टमध्ये हे कामगार स्वच्छतागृहे स्वच्छ करतात. सर्व शौचालयांमध्ये अखंड वीजपुरवठा असतो. जेथे वीजपुरवठा शक्य नाही, तेथे जनरेटरची सोय केली जाते. जेटिंग मशीनने सर्व शौचालयांची वेळेवर स्वच्छता करण्यात येते. सर्व शौचालये सक्शन मशीनने वेळोवेळी रिकामी केली जातात. शौचालय वाहतूक, बांधकाम, पाणीपुरवठा, जेटिंग/स्वीपिंग, वीज, सांडपाणी सक्शन अशी चोख व्यवस्था असल्यामुळे वारकऱ्यांना कुठलीच अडचण येत नाही.  

        पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, स्थानिक अधिकारी यांच्या उत्तम समन्वयामुळे तसेच या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांच्या उत्कृष्ट व प्रभावी अंमलबजावणीमुळे हा पालखीचा ‘जगन्नाथरुपी रथ’ व्यवस्थित ओढला जात आहे.  

        चौकट 1

 महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात महिलावर्गही मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे. महिलांची कुचंबणा होऊ नये यासाठी त्यांना स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या शौचालयासाठी महिला कामगारांचीच व्यवस्था करण्यात आली असल्यामुळे महिला वारकरी निश्चिन्त झाल्याचे चित्र दिसते. याशिवाय महिला प्रसाधनगृह परिसरातही मास्किंग करण्यात येते. 

         चौकट 2. 

100 ट्रकमधून फिरत्या शौचालयांची वाहतूक 

     संत तुकाराम पालखी मार्गावर साधारणपणे 1000 फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली आहे. चार बाय चार आकाराचे एक शौचालय असून एका ट्रकमध्ये 10 शौचालये बसतात. त्यानुसार दररोज 100 ट्रकमधून ही वाहतूक सुरू असते. त्याबरोबरच मैला वाहतूक आणि पाण्याचे टँकर अशा 100 ट्रक आणि जेटिंगसाठीच्या 25 गाड्या असे एकूण 225 ते 250 ट्रकची रोजची वाहतूक सुरु असते.