Home देशविदेश “सैराट”वाघोबांचे लाड अजून किती बळी देऊन पुरवायचे?..

“सैराट”वाघोबांचे लाड अजून किती बळी देऊन पुरवायचे?..

रोखठोक…(भाग १)

     प्रा.महेश पानसे…

     कालपरवा मुल तालुक्यातील चिचोली येथे वाघाने पुन्हा एक नरबळी घेतला. याच महिन्यात या आधी तालुक्यातील मरेगाव व ताडाळा येथील दोन गुराखी वाघाच्या हल्ल्यात मरण पावले आहेत.

           काल परवाच्या दुदैवी घटनेत ६२ वषींय देवाजी बाबुराव राऊत यांचा बळी वाघाच्या हल्लयात बकऱ्या चारताना झाला आहे.गत तिन वर्षातली वाघ बळींची संख्या बघितल्यास सरासरी ही वर्षाकाठी २०० वर गेलेली दिसेल.

        यात मुख्यता शेतकरी, शेतमजूर व गुराखी यांचाच समावेश आढळतो. वनमंत्री पालक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वाघोबा लाडावून ” सैराट” झालेत का? व यांचे लाड आता किती मानव बळी देऊन पुरवायचे? हे तरी वनविभागाने सांगावे अशी संतप्त विचारणा होऊ लागली आहे.

          कुटुंब चालविण्यासाठी स्वतः ढोर मेहनत घेऊन शेतात रात्रंदिवस राबणारे शेतकरी,पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणारे शेतमजूर व बकऱ्या,गाई,म्हशी चारायला नेणारे गुराखी यांच्या रोजगारावर वाघोबाने संक्रांत आणलीच आणली वरून घर चालविणाऱ्या म्होरक्यांना हिसकावणाऱ्या या घटना त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच निराधार करुन त्यांचे भविष्यच संपविणाऱ्या ठरल्या आहेत.

           एकिकडे ताडोबा कोअर झोन,बफर झोन चार उदोउदो करून साऱ्या जिल्ह्याभर ‘ गेट’ उभारून मोठा रोजगार उभा केला, पर्यटनातून जिल्ह्यात लक्ष्मी येऊ लागल्याच्या बावळया उठविणाऱ्यांना मात्र त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे सैराट झालेले वाघोबा दारोदारी निघाले आणि आजमितीस असंख्य शेतकरी,शेतमजूर व गुराखी यांचे परिवार दुरगामी बेकार,निराधार, दुःखी झालेत.

         रूपयाची कमाई दाखविण्याच्या नादात ही अतीमौलीक हानी ‘वाघोबा रक्षकांना’ का दिसू नये याचे नवल वाटते.

       चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीच वनविभागाचे म्होरके असताना वाघोबा ऐवढे “सैराट” का व्हावेत? हा सवाल गंभीर ठरतो.

                वाघांच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यातच दिवसागणिक वाढतच आहे. एकीकडे रानटी डुकरांनी गत अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे तर दुसरीकडे मोकाट वाघोबांनी आधीच तजलेल्या शेतकरी, शेतमजूरांच्या जिवावर उठणे सुरू केले आहे.

         यावर गंभीर चिंतन होऊन काही तांत्रीक उपाययोजना करण्यात कुणाच्या बा चे काय चालले हे कळायला वाव नाही. वाघांच्या हल्ल्यात शेतकरी, शेतमजूर,गुराखी दगावल्यावरच विरोधकांना जोर येतो.

         वाघ मानव संघर्षाच्या बातम्या दररोज झळकतात तसे आंदोलन,मागण्या,घेराव,चक्काजाम कुठे होतात? निवेदन देऊन रानडूकर,वाघांना पाठीशी घालणारा वनविभाग ऐकणार आहे का?

          आधी घनदाट जंगले होती.मात्र वाघ मानव संघर्ष नगण्य होता असे शंभरी गाठणारे सांगतात. आता तर सरकार दरबारी कोट्यवधी वुक्षांची लागवड होऊनही जंगले फक्त रस्त्याचे कडेलाच दिसतात. वाघांना संरक्षण देऊन वाघांची संख्या वाढली पण त्यांचे नैसर्गिक अधिवास क्षेत्र राहीले कुठे? आधी गुराखी नव्हते का? कितीतरी अधिक पटीने होते. शेतकरी वास्तव्यास शेतात राहायचे. आता भर दिवसाच वाघोबाचे रक्तरंजीत तांडव का? वाघोबांचा मोठा अधिवास तुमच्या पर्यटनाच्या हट्टापायी संपला तर नाही ना? यावर कुठे चर्चा होताना दिसत नाही. 

         कुटुंबियांना भिक नको. घरचा करविता नजरेसमोर हवा. २०,२५ लाख देऊन त्या मयताच्या परिवाराचे कौटुंबिक भविष्य वनविभाग परत देऊ शकत नाही.हे त्रिवार सत्य आहे.

            आजमितीस हजारो करोड वाघ बळींच्या कुटुंबियांना मदत म्हणून दिली गेली असेल.एवढाच पैसा नियोजन बद्ध पद्धतीने मजबूत कुंपणे,राखीव कुरणे व वन्यप्राणी संरक्षणासाठी लावले असते तर कदाचित आपला शेतकरी, शेतमजूर,गुराखी आज सुरक्षित भावनेने आपल्या उद्योगात असता.परिवाराच्या मदतीला त्याचा वाढता उद्योग असता.

     हे तेवढेच खरे..