आरोग्य सेवेत दुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा… — सलग दुसऱ्या वर्षी अव्वलस्थान…. — जिल्ह्यासाठी अभिमानास्पद व गौरवाची बाब…

 

प्रितम जनबंधु

संपादक 

 

गडचिरोली:- पायाभूत सुविधांचा अभाव, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरपाड्यांवर दळणवळणाची अपुरी साधने असताना खडतर प्रवास करत आरोग्यसेवा पुरविण्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी गडचिरोली जिल्ह्याने आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीच्या (एचएमआयएस) गुणांकनात १०० पैकी ९२ गुण घेऊन राज्यात अव्वलस्थान पटकावले आहे. जिल्ह्यासाठी ही मोठी अभिमानास्पद व गौरवाची बाब मानली जात आहे.

        वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता व एकसूत्रता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एचएमआयएस) वापर केला जातो. यामध्ये आरोग्य विभागाकडून केले जाणारे लसीकरण, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, तपासणी, उपचार, गरोदर माता व नवजात बालकांची तपासणी, उपचार, प्रसूती आदी विविध सेवांची नोंद केली जाते. विविध आरोग्यसेवांच्या प्रत्यक्ष कामानुसार गुणांकन केले जाते. या प्रणालीचे अंतिम गुणांकन १९ सप्टेंबरला जाहीर झाले. यात गडचिरोलीने २०२२- २३ मध्ये अव्वल क्रमांक मिळवला.

          यापूर्वी २०२१- २२ मध्येही प्रथम स्थान पटकावले होते. यंदा गडचिरोलीनंतर पुणे जिल्ह्याने ९१ गुणांसह द्वितीय तर परभणीने ८९ गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. यवतमाळ चौथ्या स्थानी असून ८८ गुण मिळाले आहेत.

         गडचिरोलीत खडतर परिस्थितीत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या विविध सेवांची ही पावती आहे. राज्यात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम स्थान मिळाल्याचा अभिमान आहे. शेवटच्या स्तरावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे. या निर्देशकांचे केंद्र शासनाच्या पोर्टलवर गुणांकन करण्यात येते. यावेळी गडचिरोली जिल्ह्याने त्यात सर्वाधिक गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

         जिल्हाधिकारी संजय मीणा आणि मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने हे यश संपादन केले आहे. जिल्ह्यात अतिदुर्गम भाग आणि इंटरनेटची अडचण असताना आरोग्य विभागाने दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावलकुमार साळवे यांनी सांगितले.

          जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.स्वप्निल बेले, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा, वेळोवेळी घेतलेले प्रशिक्षण, तसेच तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्ह्याने अव्वल स्थान मिळविल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावलकुमार साळवे यांनी सांगितले.

         जिल्ह्याने आरोग्य सेवेत एकीकडे राज्यात प्रथम स्थान पटकावले असले तरी भामरागड, सिरोंचा यांसारख्या दुर्गम तालुक्यांत अद्यापही पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना कावड करुन किंवा झोळीतून दवाखान्यात नेले जाते तर कधी मृतदेह दुचाकीला बांधून न्यावा लागतो. त्यामुळे आरोग्यसेवा अधिक सुलभपणे देता याव्यात यासाठी रुग्णवाहिका, पक्के रस्तेे, मुबलक मनुष्यबळ, दर्जेदार सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.