Home Maharashtra देसाईगंज ते कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती :- आमदार रामदास मसराम...

देसाईगंज ते कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती :- आमदार रामदास मसराम यांचा पुढाकार..

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

देसाईगंज सप्टेंबर २०२५ :- देसाईगंज ते कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. सततच्या तक्रारींनंतर आणि प्रवाशांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन, आमदार रामदास मसराम यांनी संबंधित विभागाचे लक्ष या समस्येकडे वेधले. त्यांच्या तातडीच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) त्वरित पावले उचलली असून, आजपासूनच या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.

         देसाईगंज ते कुरखेडा मार्ग हा गडचिरोली जिल्ह्यातील एक महत्त्वाचा दळणवळण मार्ग असून, या मार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. मात्र मागील काही महिन्यांपासून या मार्गावर अनेक मोठ्या खड्ड्यांनी डोके वर काढले होते. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः पावसाळ्याच्या काळात हे खड्डे अधिकच धोकादायक ठरत होते.

        स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग, तसेच प्रवासी अनेकदा या समस्येवरून नाराजी व्यक्त करत होते. विविध सामाजिक संस्थांनी देखील वेळोवेळी निवेदने देऊन महामार्गाची तातडीने डागडुजी करण्याची मागणी केली होती.

       या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी याचा गांभीर्याने विचार केला. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अभियंता लिंगावार साहेब, अभियंता खापरे साहेब, स्वामी साहेब यांच्या शी थेट चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले. त्यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत, आज नेशनल हायवेच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

         कामाची सुरूवात देसाईगंज शहराजवळील भागापासून झाली असून, पुढील काही दिवसांत संपूर्ण मार्गाची दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कामासाठी विशेष मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे.

आमदार मसराम यांची प्रतिक्रिया

        या संदर्भात बोलताना आमदार मसराम म्हणाले, “देसाईगंज ते कुरखेडा मार्ग हा जिल्ह्याच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर प्रवाशांना त्रास होतो हे खरेच दु:खद आहे. म्हणूनच मी वैयक्तिक लक्ष घालून संबंधित विभागाकडे ही बाब पोहोचवली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.”

        स्थानिक नागरिकांनी देखील आमदार मसराम यांच्या या तात्काळ कृतीचे स्वागत केले असून, रस्त्याची दुरुस्ती लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

        आमदार मसराम यांचा सतत रस्त्यांच्या संबंधाने अधिकाऱ्यांशी संवाद होतं असते मग तो कुरखेडा येथील सती नदी पुलिया चा आढावा असो गोठणगाव टी पॉइंट असो आंधळी बाईपास असो किवा मग राष्ट्रीय महामार्ग असो आमदार मसराम हे सतत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असतात.