Home देशविदेश वर्गातील जाती आणि जातीतील वर्ग…

वर्गातील जाती आणि जातीतील वर्ग…

     जगाचा विचार केला तर असे दिसून येईल की, जगातील प्रत्येक देशात गरीब मध्यम श्रीमंत असे ढवळमानाने तीन आर्थिक स्तर आहेत,म्हणजे जग हे वर्गीय व्यवस्थेने बनलेले आहे. यास भारत देश पण अपवाद नाही. 

     इटली,फ्रान्स,जर्मनी इत्यादी युरोपीय देशात क्रांती यशस्वी झाल्या,त्याचे कारण त्या खंडात जमीनदारी संपुष्टात येऊन तिथे कारखानदारी अस्तित्वात आली,म्हणून कामगार मालक असे सरळ सरळ आमने सामने मालक कामगार असे दोन वर्ग उभे राहिले,त्यांच्यात संघर्ष सुरू झाला,त्यातून फ्रेंच,जर्मन,इटली समाजवादी क्रांती झाली.हे पाश्चिमात्य देशात घडले.पण अशा आर्थिक समाजवादी क्रांत्या पूर्वेकडील देशात.घडून आल्या नाहीत,याचे कारण येथील जमीनदारी संपुष्टात येऊन इकडे कारखानदारी निर्माण झाली नाही.शिवाय या पूर्वेकडील देशात धर्माचा आणि भारतात जातीचा पगडा असल्यामुळे वर्गीय संघटन आणि वर्गीय क्रांती झाली नाही.धर्म आणि जाती ची अडचण असल्यामुळे कम्युनिस्ट चळवळीस इकडे वर्गीय लढे यशस्वी करण्यात अडचण होत आहे.मुस्लिम देशातील जनतेच्या डोक्यात धर्माचे भूत आणि हिंदुधर्मिय देशात जातीचे भूत घुसल्यामुळे वर्गीय लढे यशस्वी होताना दिसत नाहीत.म्हणून हिंदू मुस्लिम देशातील जनतेची गरिबी काही केल्या जात नाही.हे देश आर्थिक दृष्ट्या संपन्न होत नाहीत,झाले तरी गरीबी,बेकारी,भिकारी,दरिद्री या देशातून जाणारच नाही.कारण या देशातील जनतेस धर्माची शिकवण अशी आहे की,” तू गरीब का आहेस ? याचे कारण देवाची इच्छा,आणि दैव,आणि पूर्वजन्मीचे पाप.अशी मानसिकता असल्यामुळे आणि जाती साठी माती खाण्याची शिकवण असल्यामुळे इथे धर्म जाती ची पकड मजबूत आहे.खरे तर शिक्षण , विद् न्यान,तंत्रद्न्यान एव्हढे विकसित होऊनही,21 व शतकातही लोकांची प्रतिगामी मानसिकता जात नाही.म्हणून आर्थिक समतेची क्रांती या देशात होत नाही.तसेच सामाजिक समतेची क्रांती सुद्धा होताना दिसत नाही.

    बाबासाहेबांनी ” कास्ट इन इंडिया ” या पुस्तकात म्हटले आहे की,भारतात जातीव्यवस्था मजबूत असून प्रत्येक जात म्हणजे एक सामाजिक वर्गच होय.आणि हा जात वर्ग बंदिस्त आहे.त्यास जातीबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नाही.जात बदलण्याचे स्वातंत्र्य नाही.कारण रोटीबंदी आणि बेटीबंदी ची अट आहे.यास धर्माचे पाप पुण्याचे अधिष्ठान आहे.तशी मानसिकता प्रत्येक जातीतील माणसात निर्माण केल्या गेली आहे.जातीचा गर्व अभिमान शिकविल्या गेला आहे.म्हणून जातीसाठी माती खाऊ,पण आम्ही सारे गरीब , मध्यम म्हणून एकत्र येणार नाही.जाती लढाई करू,जाती अजून मजबूत करू,प्रसंगी उपा सी राहू,पण वर्ग म्हणून संघटित होणार नाही,वर्गसंघर्ष करणार नाही,गरिबीतून मुक्त होणार नाही,असा जणू संकल्पच या जातीवादी गरिबांनी केलेला दिसतो.

      भारतात असो की,मुस्लिम देशात असो,प्रचंड गरिबी आहे,पण सारे गरीब एक व्हायला तयार नाहीत.या देशात गरीब ,मध्यम,श्रीमंत असा वर्गीय समाज आहे.या वर्गात जाती आहेत.पण वर्गातील जाती एकत्र येत नाहीत,म्हणून वर्गसंघर्ष होत नाहीत,आणि जाती संघर्ष रोजच होताना दिसतात.

      जसे वर्गात जाती आहेत,तसेच प्रत्येक जातीत वर्ग आहेत.प्रत्येक जातीत गरीबवर्ग आहे,मध्यमवर्ग आहे,श्रीमंत वर्ग आहे.हे पण एकत्र नाहीत,यांना पण वर्गीय अभिमान आहे,वर्गीय अस्पृश्यता आहे,प्रत्येक जातीतील वर्ग हे आपले स्टँडर्ड मेन्टेन करण्याचा प्रयत्न करतात.शिक्षण,आरोग्य,भोजन,सोयरिक करणे या गोष्टीत भेदभाव असतो.कारण जात एक असली तरी वर्ग एक नाही.प्रत्येक वर्गाची संस्कृती ( खानपान,पोशाख,चालीरीती,देवधर्माची परंपरा ) या भिन्न भिन्न दिसतात.तरी जातीचा नुसता अभिमान असतो.वर्गीय जीवनाचा तिटकारा असला पाहिजे.पण त्याऐवजी वर्गीय लाचारी असते. ती निमूटपणे सहन करण्याची मानसिकता असते.नव्हे ही मानसिकता जाती आणि धर्माच्या शिकवणुकीतून निर्माण केली गेली.अजूनही आर्थिक समतेची , सामाजिक समतेची शिक्षण देण्या ऐवजी विषमतेचे च शिक्षण देण्याचे कार्य हे जातीसंस्था आणि धार्मिक संस्था करीत आहेत,सरकारच्या मदतीने.

    शाहू महाराजांच्या शिकवणीतून आणि कार्यातून आम्ही ‘ सामाजिक न्यायाचा धडा ‘ घेतला.त्यानुसार घटनेत तरतूद करून ‘ आरक्षणाचे तत्व ‘ स्वीकारले.याचे कारण हजारो वर्षापासून वंचित मागास असलेल्या जातींना पुढारलेल्या जातीबरोबर आणण्यासाठी.शिक्षण,नोकरी,सत्तेत संधी देण्यात आली.यामुळे मध्यमवर्गात वाढ झाली.पण गरीबवर्ग संपला नाही,श्रीमंत वर्ग घटला नाही.उलट गरीब आणि श्रीमंतातील दरी बुजण्याऐवजी रुंदच होत गेली.साधेश्रीमंत अजून मोठे झाले.मोठे श्रीमंत भांडवलदार झाले.जमीनदारांना तर दुहेरी संधी मिळाली,जमीनदार आणि कारखानदार दोन्ही एकाच वेळी.म्हणून समाजावरची पक्कड अजून दृढ झाली.वर्चस्वात वाढ झाली.अर्थात हे आरक्षणाने झाले असे नाही.मात्र आरक्षणाने जातीत गरीब आणि श्रीमंत वर्ग होते,त्यात मध्यमवर्गाची वाढ झाली.आणि हा मध्यमवर्ग गरिबाना मदत करण्याऐवजी श्रीमंतनाच मदत करू लागला.याचा अर्थ मध्यमवर्ग हा श्रीमंतवर्गास पूरकच ठरतो,असतो.तरी परंतु मध्यमवर्गाने जर गरीब वर्गास साथ दिली,तर निश्चितच प्रवर्तन होते,क्रांती होते.श्रीमंतांचा वाटा गरीबांना मिळतो,गरीब श्रीमंतीतील रुंदवलेली दरी कमी होते.यासाठी मध्यमवर्गीयांची गरीबांना साथ देण्याची मानसिकता दृढ व्हावी लागते.

    आधी जातीअंतर्गत असलेले वर्ग आणि वर्गीय संघटन होणे जरुरीचे आहे.जात म्हणून जातीतील वरिष्ठ वर्गास साथ देण्याची भूमिका गरीब वर्गाने सोडली पाहिजे.आणि इतर जातीतील गरीब वर्गाशी दोस्ती केली पाहिजे.प्रत्येक जातीतील गरीब वंचित एक झाले,तर वर्गीय ताकद वाढेल,यामुळे आर्थिक समतेची लढाई यशस्वी होईल,याबरोबरच समांतर सामाजिक समतेचा लढा पण लढल्या जाईल.वर्गीय मिलन हे जातीय भावना नष्ट करण्यास पूरकच ठरेल.

       म्हणून हा देश जसा जातिव्यवस्थेचा आहे,तसाच वर्गव्यवस्थेचा पण आहे,म्हणून गरीबवर्गातील सर्वजाती एकत्र आल्या पाहिजेत.आणि सर्वजातीतील गरीब वर्ग एक झाला पाहिजे.असे घडून आले तरच परिवर्तन शक्य आहे.अन्यथा 21 व च काय ? अशी अनेक शतके उलटून गेली तरी परिवर्तन शक्य नाही.

            लेखक

           दत्ता तुमवाड

      सत्यशोधक समाज नांदेड

                फोन : 9420912209.