विद्यालयाच्या जागेपायी,
कुणीच इथं भांडलं नाही..
अन्..देवालयाच्या जागेसाठी
रक्त इथं कमी पडलं नाही..
— माझाच देव मोठा म्हणण्यात,
रक्ताच्या नद्या वाहील्या…
ज्ञानगंगा कोरडी पडत,
ओसाड शाळा झाल्या…
— शाळा अजुनही तशीच,
पडक्या,तुटक्या भिंतीची….
गरीब माझ्या देशामधली,
मंदिरं उभी सोन्याची…
— धर्मासाठी,पैशांसाठी,
आंदोलने अनेक पाहिली…
पण शिक्षणाच्या भल्यासाठी,
कुणी ग्वाही दिलीच नाही…
— शाळे मधली दानपेटी,
भरलेली कधी पाहिली नाही..
अन् मंदिराची दानपेटी,
रिकामी कधी दिसली नाही…
— शाळेतला पालक मेळावा,
पालकांवाचून राहून गेला…
देवालयात चेंगराचेंगरीत,
माणुस मात्र तुडवून मेला…
— विद्येचं ज्ञान देऊन,
गुरूजी गरीबच राहीला..
अन् ‘अंधभक्तांचं’ दान घेऊन,
पुजारी बराच धनवान झाला…
— खरंतर धर्म नावाचं पुस्तक,
शाळेत कधीच उघडत नाही..
अन् धर्माच्या नावाशिवाय,
देशात पानही हालल नाही..!
“देशात पानही हालल नाही…!!
***
लेखक
अजय तुम्मे
संस्थापक अध्यक्ष
माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य…

